संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा
🍀 नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी श्री सचिन शिंदे
🍀 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🚩 *अध्याय २ रा*
🍀 *ओवी ३१० पासून*
🍀 *¦¦सांख्ययोग¦¦*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🌻यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः |इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ||२-६०||*
अर्थ👉 _हे अर्जुना, बुद्धी स्थिर होण्याकरता प्रयत्न करीत असलेल्या विवेकी पुरुषाचेही मन चित्तक्षोभक इंद्रिये बलाने विषयाकडे ओढतात._
➖➖➖➖🌹➖➖➖➖
*🌷येर्हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना।जे रहाटताती जतना ।निरंतर ॥३१०॥*
अर्जुना ही इंद्रिये इतर कोणत्याही साधनानुष्ठानाने स्वाधीन होत नाहीत. इंद्रिये आपापले विषय सोडत नाहीत. म्हणून जे या इंद्रियांना जिंकण्याचा जपून व निरंतर प्रयत्न करतात.
*🌷जयातें अभ्यासाची घरटी ।यमनियमांची ताटी ।जे मनाते सदा मुठी । धरूनि आहाती॥३११॥*
जे साधक आपल्या भोवती अभ्यासाचे घरटे करून त्यास यमनियमाचे कुंपण लावतात आणि मनाला तर सदा मुठीत धरून बसतात.
*🌷तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी। जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां॥ ३१२*
*अशा साधकाला सुद्धा ही इंद्रिये विषय भोगण्याकरीता व्याकुळ करतात,* एवढा या इंद्रियांचा प्रताप आहे. ज्याप्रमाणे मांत्रिकास एखादी हडळ, डाकीण चकवा देतेच.
*🌷देखे विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषें ।मग आकळती स्पर्शें । इंद्रियांचेनि ॥३१३¦¦*
त्याचप्रमाणे हे विषय रिद्धिसिद्धीच्या रूपाने, साधनेच्या तपाच्या माध्यमातून प्राप्त होतात. व *इंद्रिया संबंधद्वारा योग्यांचीही मने भ्रष्ट करतात.*
*🌷तिये संधी मन जाये । मग अभ्यासां ठोठावलें ठाये । ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचे॥३१४¦*
मग हे मन परत इंद्रियांच्या कचाट्यात सापडले की मन पंगू झाल्यामुळे अभ्यास जागच्या जागी राहतो. असाही प्रताप या इंद्रियाच्या जवळ आहे.
➖➖➖➖🌹➖➖➖➖
*🌻तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः |वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ||२-६१||*
अर्थ👉 _त्या सर्व इंद्रियांचे संयमन करून योगयुक्त होऊन माझ्यावरच चित्त ठेवलेला असे असावे. ज्याची इंद्रिये स्वाधीन आहेत त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे._
➖➖➖➖🌹➖➖➖➖
🌷 *म्हणोनि आइकें पार्था । यांते निर्दळी जो सर्वथा ।सर्व विषयीं आस्था । सांडूनिया॥३१५॥*
म्हणून अर्जुना, जो सर्व विषयांची आसक्ती, इच्छा सोडून या इंद्रियांना सर्वतोपरी दमन करून आपल्या स्वाधीन ठेवतो.
*🌷तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण । जयाचे विषयसुखे । अंतःकरण झकवेना ॥ ३१६ ॥*
आणि *ज्याचे अंतःकरण विषयाचे सुखाने भुलून फसले जात नाही, तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास योग्य अधिकारी आहे.*
*🌷जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु । जो मातें हृदयाआंतु ।विसंबेना॥ ३१७॥*
कारण तोच नेहमी आत्मज्ञानाने संपन्न होवून राहतो व अंतःकरणात मला कधीच विसरत नाही.
*🌷एर्हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांही । तरी साद्यंतुचि हा पाहीं । संसारु असे ॥ ३१८॥*
एर्हवी जरी एखाद्याने शब्दादि बाह्य विषयाचा प्रत्यक्ष स्वीकार केला नाही, पण मनात जर विषयाची थोडीशीही वासना असेल तरी, त्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत, जन्ममरणाचा फेरा, सर्व संसार चुकत नाही. म्हणून विषयाची किंचितही अभिलाषा नसावी.
*🌷जैसा कां विषाचा लेशु । घेतलिया होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥३१९॥*
जसे विष हे सेवन करतेवेळी जरी थोडे असले तरी परीणामी फार होते. मग ते शरीरात पसरून जीवाचा निःसंशय नाश करते.
🌷 *तैसी या विषयांची शंका । मनीं वसती देखा । घातु करी अशेखा । विवेकजाता ॥३२०॥*
त्याप्रमाणे मनात विषयांची सूक्ष्म संस्काररूप थोडी जरी इच्छा राहिली तरी ती सर्व विचारसमूहाचा घात करते.
⛳⛳⛳🔔🕉️🔔⛳⛳⛳
🌹 *ओवी ३२१ पासून उद्या*
🌿 *¦¦जयजय रामकृष्ण हरि¦¦*